‘मुंबई मेरी जान’ – चुकवू नये असा!


मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला – ‘डोंबिवली फास्ट’. चित्रपट फारच सुरेख जमलाय…मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही….फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.

सुचना/Disclaimer – Spoilers ahead! आणि हे वस्तुनिष्ठ, तटस्थ वगैरे परिक्षण नाही, सिनेमा खूप आवडला, म्हणून लिहिले! Nothing objective about it!

चित्रपट ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमधे झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात डोकावून बघतो. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा १००% तुमच्या-आमच्यासारखी माणसे वाटतात आणि तुमच्या-आमच्यासारखीच वागतात. सगळ्याच व्यक्तिरेखा फार सुरेख, तपशीलात लिहिल्यात आणि तितक्याच सशक्तपणे त्या पडद्यावर त्या-त्या कलाकारांनी निभावल्यात – चित्रपटाचे कास्टिंग हे चित्रपटाचे एक महत्वाचे बलस्थान – सगळेच कलाकार त्या-त्या व्यक्तिरेखाच वाटतात. अगदी माधवन पण फार हिरोगिरी न करता प्रामाणिकपणे भुमिकेत शिरतो आणि त्याहून महत्वाचे म्हणजे (नेहमीप्रमाणे चुकार मुलासारखा बाहेर न पडता) बहुतांश वेळ भुमिकेतच राहतो! Wink

ह्यातील पात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाला साजेशी वागत राहतात, आणि त्यातून निर्माण होते ते नाट्य, आणि या सगळ्याच्या पार्श्वभुमीला हादरवून सोडणार्‍या बॉम्बस्फोटांचा अनुभव! चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो, आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवतो! ह्यात वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आहे – -आणि मुंबई ह्या एका धाग्याने त्यांना सहजपणे बांधून ठेवले आहे. लोकलमधील बाँबस्फोट ह्या एकाच अनुभवाचे त्यांच्या भावविश्वात वेगवेगळे पडसाद उमटलेत.

माधवन हा एक उच्च-मध्यमवर्गीय, पर्यावरण, सार्वजनिक वाह्तूकीचे फायदे ह्यांची जाणीव असलेला, एक कॉर्पोरेट नोकरीपेशा माणूस. योगायोगाने त्या दिवशी सेकंड क्लास मधे बसतो आणि म्हणूनच वाचतो…पण ह्या अनुभवाने पुर्णपणे हादरून जातो…त्याची बायको प्रेग्नंट…तो ऑनसाईट बद्दल विचार करु लागतो…गाडीच्या शोरुम मधे जाऊन गाडी विकत घ्यायचा विचार करू लागतो…लोकलविषयी एक अनामिक भीती मनात बसते…

दुसरा असाच साधा, गरीब केरळी चहावाला – इरफान….त्याच्या जीवनात तसा फारसा फरक पडला नाही, पण पुर्वी एकदा मॉल मधे पत्नी व मुलीबरोबर झालेल्या अपमानाचा बदला घ्ययचा म्हणून फोनवरून मॉलमधे बाँब ठेवल्याच्या खोट्याच बातम्या देतो..आणि ते खाली होणारे मॉल, भयभीत उच्चवर्णीय लोग बघून आसूरी आनंद घेत असतो, आणि असाच एक दिवशी त्याला त्याच्या अफवांचे गांभीर्य कळते…. (नाही, नाही – त्याची मुलगी चिरडत वगैरे नाही….असेच बाळबोध cliché निशिकांतने टाळलेत!)…फारशे संवाद नसले तरी इरफानने ही भुमिका फारच छान केली आहे! केरळी टच ही त्याची आयडीआ होती म्हणे!

तिसरी सोहा-अली-खान, ही ‘खोया खोया चांद’ पासून अभिनेत्री म्हणून बरीच प्रगल्भ झाली आहे. तर ही (अशाच) एका न्यूज चॅनलची रिपोर्टर…तोच कुप्रसिद्ध प्रश्न ‘आप को इस वक्त कैसा लग रहा है?’ विचारणारी…तिचा भावी जोडीदार (समीर धर्माधिकारी) ह्या बाँबस्फोटात मरण पावतो आणि तिच्या न्यूज चॅनलवर तिलाच ह्या प्रश्नाला सामोरे जावे लागते…नंतर तिच्यावर ‘रुपाली बनी रुदाली’ अशी स्टोरी बनवली जाते…ही तिच्या आयुष्यातली उलथापालथ!

चौथा बेकार, मित्रांबरोबर टवाळक्या करणारा, मुस्लिमद्वेष्टा सुरेश; के के मेनन – त्याने ह्याही भुमिकेचे सोने केले आहे….त्याला कुठल्याही भुमिकेत टाकले तरी तो १००% निभावतो….तर हा असाच एक चहाच्या दुकानात टाइमपास करणारा मुलगा… बॉम्बस्फोटांनंतर तर अधिकच कट्टर होतो….शेजारच्या टेबलावर बसणारा युसुफ त्या दिवसानंतर दिसत नाही, तर ह्याचा संशय अजूनच बळावतो…तो मग त्याचा माग काढतो, घर शोधतो…तो सगळाच सिक्वेंस छान घेतलाय…त्याचे छोटे, छोटे संवाद ‘ये लोग किशोरकुमार कभी नहीं सुनेंगे’, किंवा पटकन ओंकार असलेले लॉकेट लपवणे, नजरेनेच ‘बघ मी सांगत नव्हतो तुला?’ असे मित्राकडे बघणे…सगळेच दाद देण्यासारखे. के के मेनन ग्रेटच आहे, आणि तितकीच दाद निशिकांत च्या टेकींगला!

आणि शेवटी पाचवा ह्या सगळ्यांना वरताण – हवालदार तुकाराम पाटील; परेश रावल! हा अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक (याचा अर्थ बाकीचे सूमार आहेत असा अजिबात नाही. खर तर के के मेनन आणि परेश रावल मधे डावे-उजवे करणे अवघड आहे!)…ह्या हवालदाराला रिटायरमेंटला काहिच दिवस राहिलेत…त्यातच ही घटना घडते…तिथे कदम नावचा एक नवीनच हवालदार भरती झाला आहे…ह्या पात्राचेही एक उप-कथानक आहे…त्याची हनीमूनची सुट्टी बॉम्बस्फोटांमुळे कँन्सल होते…त्यामुळे तो चिडलेला….मग त्या अनुषंगाने येणारे पोलिसांचे किस्से, त्यांचा तपास…नागरिकांशी संवाद…त्या हवालदार तुकाराम पाटीलला येणारी क्षुद्रतेची (insignificant असल्याची), वैफल्याची भावना त्यावर त्याचा विनोदाचा उतारा, आणि ह्या सगळ्या पलिकडे दिसणारा त्याचा कनवाळू समजूतदारपणा…ही भुमिका परेश रावलने अफलातून केली आहे. हा माणूस खरच अशक्य आहे….त्याचे पोलीस स्टेशनमधले शेवटचे भाषण, के के मेननला व्हॅन मधे बोलवतो तो प्रसंग…हे सगळेच अफाट….काहिही विशेष प्रयत्न न करता हा माणूस फक्त ‘हवालदार तुकाराम पाटील’ वाटतो! परेशला फक्त जागेवरूनच सलाम! बॉस, तुम सचमुच मे बहुत बडा आदमी है बे!

ह्या सगळ्यात जाणवणारी निशिकांतची दिग्दर्शक म्हणून प्रगल्भ समज आणि ह्या माध्यमाची अनन्यसाधारण जाण- ह्याचा हा फक्त दुसरा चित्रपट आहे हे सांगूनही खरे वाटत नाही! सगळ्यात महत्वाचे त्याने निवडलेली पटकथेची व्याप्ती आणि त्याची ट्रीटमेंट – फिल्मी होण्यासारखे खूप प्रसंग, उपकथानक असूनही त्याने तो मोह टाळला आहे. तसेच आपल्याला ह्या चित्रपटात अशा घटनांचा तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर होणारा परिणाम एवढेच (आणि फक्त तेवढेच) दाखवायचे आहे हे त्याने पक्के ठरवले आहे – आणि म्हणूनच ते तो तो खूप परिणामकाररित्या दाखवू शकला आहे – मला वाटते हे त्याचे यश खूप मोठे आहे. त्याची प्रतिके, त्याचे भाष्य हे खूप सहजपणे चित्रपटाचा भाग म्हणून येते – ते प्रसंग मुद्दाम घुसवल्यासारखे, किंवा बटबटीतपणे ठिगळासारखे येत नाहीत (बटवटीतपणाच्या बटबटीत उदाहरणासाठी आठवा इंद्रकुमार इराणी साहेबांचा ‘बेटा’, कुंभाराचे चाक, ओली माती…नुसता वैताग!!!!)…कित्येकवेळा तो हे खूप प्रभावीपणे संवादाशिवायही जाणवून देतो.

एक प्रसंग — सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात…ते बोलत असतात…कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो….कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो…मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत…बॉसचे बोलणे संपते…तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात….

तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या जीवनात बॉम्बस्फोटांमुळे वेगवेगळ्या तर्‍हेने उलथापालथ होते…त्यांचे भावविश्व ढवळून निघते….यथावकाश, आपापल्या परीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी ती पात्रे सावरतात, भानावर येतात…तशीच महानगरी मुंबईही आपल्या रुळांवर चालू लागते….त्यांना आणि त्यांच्यावरोबरच ह्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार (खर तर भागीदार म्हणावे इतका चित्रपट सुरेख/वास्तवदर्शी झाला आहे) असलेल्या आपल्यालाही जाणवते….की जीवन अपरिहार्यपणे पुढे जातच राहते! आणि ही जाणीव एक बधीर, भावनाशून्य जाणीव नसते, तर ती असते एक सहृदय, समंजस, ओली जाणीव….

(मास्तरांच्या भाषेत सांगायचे तर) चित्रपटाचे प्रिमाईस एका ओळीचे – Life still goes on… आणि कुठेही शब्दबंबाळ, अतिरेक न करता ‘मुंबई मेरी जान’ हे सहजपणे आपल्याला जाणवून देतो. बॉम्बस्फोटांसारखा हादरवणारा विषय असूनही निघतांना आपण सहजपणे गुणगणतो, ‘ऐ दिल, है मुश्किल जीना यहाँ…!’

2 thoughts on “‘मुंबई मेरी जान’ – चुकवू नये असा!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.