कॉलेजमध्ये एक वय असतं, गज़ल आवडायचं, तासन्-तास ऐकत बसायचं. आणि एक रिदमही असतो कधी, कुठल्या गज़ल आवडतात ह्याचा. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला कुठलातरी मित्र गळ्यात हात टाकून, सेंटी होऊन ‘ज़िंदगी धूप तुम घना साया…’ गायला लागायचा आणि पुढच्याच सेमिस्टरला एकदम दाढी वाढवून दर्दभर्या आवाजात ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है’ वर पोहोचायचा 🙂 एका मोठ्या बहिणीच्या जगजितप्रेमामुळे लहानपणीच गज़लेशी परिचय झाला, पण गज़लप्रेम खर्या अर्थाने बहरले ते कॉलेजमधेच, अशाच मित्रांच्या सोबतीने.
तसं हिंदी, इंग्लिश गाण्यांचही वेड होतं, पण त्यात आता फार खोलात शिरत नाही, नाहीतर हे लिखाण फारच वहावत जाईल. मुळात अर्थपुर्ण गाणी आवडायची, आवडतात – त्यामुळे शब्दांकडे लक्ष असायचंच. कदाचित कवितांच्या प्रेमाचे मूळही तिथेच असावे. गाणे ऐकतांना गीतकार, शायर कोण याचे कुतुहल असायचे. साहिर आवडायचा, कैफी आवडायचे. सगळ्याच उर्दू शब्दांचे अर्थ तेंव्हा कळायचे नाही आणि अर्थ शोधायला तेंव्हा इंटरनेटही नव्हते. मग एखादा उर्दू जाणकार शोधून त्याच्याकडून समजून घ्यायचो. फ़राज़, फैज़ अहमद फैज़, कैफ़ी आज़मी, साहिर लुधियानवी, निदा फ़ाज़ली, क़तील शिफ़ाई आणि अन्य कित्येक शायरांनी उर्दूच्या नजाकतीने शब्द-संवेदना समृद्ध केली आहे. मराठीत सुरेश भटांनी गज़ल हा काव्यप्रकार जितक्या समर्थपणे, सातत्याने लिहिला तितका इतर कोणी लिहिला असे मला वाटत नाही. असो.
तर सुरुवातीला आम्ही जगजित सिंग जास्त ऐकायचो, नंतर गुलाम अली आणि मेहदी हसन गवसले. तेंव्हा गुलाम अली मला जास्त जवळचा वाटू लागला, आणि जगजित, मेहदी हसन थोडे मागे पडले. आता आवडता असा एक गज़ल गायक नाही, पण वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या, निरनिराळ्या शायरांनी लिहिलेल्या कित्येक गज़ल आजही मर्मबंधातल्या ठेवी आहेत. हा सिलसिला सुरु झाला होता तो ‘अर्थ / साथ-साथ‘ ह्या अल्बमपासून. खास करून कैफींच्या शायरीने भारावलो होतो. ऐकून, ऐकून घासली गेली म्हणून २-३ वेळा ही कॅसेट विकत घेतली होती. त्या वयाला भावणारी शायरी आणि उमेदीतला जगजितचा आवाज ह्याने ‘अर्थ/साथ-साथ’ हा गोल्डन अल्बम झाला होता. जगजित-चित्रा सिंग ह्यांनी त्यांचा तरूण मुलगा विवेक अपघातात गमावला. त्यांनी त्याच्या आठवणींसाठी ‘Someone, Somewhere‘ हा अल्बमही काढला होता, त्यानंतर चित्रा सिंग ह्यांनी गायन थांबवले. माझ्या मते त्यानंतर जगजितच्या आवाजातही एक वेगळाच ‘पॅथॉस’ आलाय. पॅथॉसवरून आठवले, ‘पिंजर’ ह्या चित्रपटात हा जगजितच्या आवाजाचा पॅथॉस, आणि कोरस फार सुरेख वापरलाय. एका आर्त आलापीच्या सुरुवातीनंतर हातातून-हात सुटल्याची चिरंतन वेदना येते ती फाळणीच्या दु:खाच्या पार्श्वभुमीवर –
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते
वक़्त की शाख़ से लम्हें नहीं तोड़ा करते
जगजितच्या स्वतःच्या गज़ल अल्बमपेक्षाही उत्तम सिंग ह्यांनी संगीतबध्द केलेली ही गीत-गज़ल ‘हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं‘ फार हलवून जाते. आणि ‘वक़्त की शाख़ से लम्हें’ हे गुलज़ार शिवाय कोण लिहिणार? ‘आनेवाला पल’ मधे नाही का लिहून गेलाय तो – ‘एक बार वक़्त से लम्हा गिरा कहीं’? अशा कवींच्या लाडक्या प्रतिमा, कल्पना वेगवेगळ्या कवितेत, गज़लेत शोधणे हे फार आनंददायी असतं. ‘हाथों में हाथ’ ही प्रतिमा स्वानंद किरकिरे यांनीही सुरेख वापरली आहे त्यांच्या गीतांमधे. तसेच अहमद फ़राज़ यांचे नींद (निद्रा) आणि मौत (चीरनिद्रा) ह्या कल्प्ननेभोवती पुन्हा-पुन्हा रेंगाळणारे काही अशआ’र (शेरचे अनेकवचन) आहेत, किंवा ‘मरासिम’ (नाती, संबंध) हा शब्द फ़राज़ बर्याचवेळा दुरवलेल्या नात्यांच्या संदर्भात लोभसपणे वापरतात. असो. वर फाळणीविषयी उल्लेख आलाच आहे तर गुलाम अलीने गायलेली अदीम हाशमींची एक अप्रतिम गज़ल आहे, ‘फ़ासले ऐसे भी होंगे‘ –
फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे और वो मेरा न थावो कि ख़ुशबू की तरह फैला था मेरे चार-सू
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता न था
वरवर ही गज़ल अर्थातच दुरावलेल्या प्रेमींविषयी वाटते, पण हाशमींनी काही ओळी फाळणीच्या जखमेवर लिहिल्यात असे वाचले आहे. गुलाम अलीने ‘फ़ासलें SSS’ गातांना ज्या काही हरकती घेतल्या आहेत, त्या अगदी जीवघेण्या आहेत. त्यातल्याच ह्या ओळींनी आयुष्यातल्या काही दु:खद घटनांवर कित्येक वेळा हळूवार फुंकर घातली आहे.
याद कर के और भी तकलीफ़ होती थी ’अदीम’
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा न था।
गुलाम अलीने तेंव्हा अक्षरशः वेड म्हणजे वेड लावले होते. तो खेळकर मस्ती, लडिवाळ आर्जवे किंवा दु:ख आणि विरहाची, असफल प्रेमाची वेदना अशा कुठल्याही भावना त्याच्या गायकीत इतक्या विनासायास आणतो की बस्स. शिवाय त्याची शास्त्रीय संगीताची बैठक पक्की आहेच. गुलाम अली आणि मेहदी हसन यांनी शास्त्रीय गायन गज़लेत आणून गज़ल भ्रष्ट केली असे काही बेग़म अख़्तर किंवा फ़रीदा ख़ानम ऐकलेल्या जुन्या-जाणत्या गज़ल प्रेमींचे मत आहे. मी त्या वादात पडत नाही. मला बेग़म अख़्तरचे ‘वो जो हम में तुम में क़रार था’ आवडते आणि गुलाम अलीचेही. पण गुलाम अली आवडतो म्हणजे आवडतोच. गुलाम अलीची ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है‘ गाजलेली आहेच, पण त्याच्या काही इतर गज़ल मला खूप आवडायच्या – जशी नासिर काज़मींची ‘दुख की लहर ने छेड़ा होगा‘, रिफ़त सुलतान यांची ‘बहारों को चमन याद आ गया है‘, काय कातिल रोमँटीक कल्पना आहे या ओळींत –
लचकती शाख ने जब सर उठाया
किसी का बाँकपन याद आ गया है।
तसेच फैज़ अहमद फैज़ यांची ‘शाम-ए-फ़िराक़ अब न पूछ‘ आहे. ही गज़ल अबिदा परवीन यांनीही ताकदीने गायली आहे, पण माझ्या मनात आधी ऐकलेली गुलाम अलीची गज़लच ऐकू येते. शिवाय अहमद फ़राज़ यांची ‘करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे‘ आवडते; (कित्येक वर्षं) सिंगल असतांना हा शेर माझा तकिया-कलाम होता. 😉
ये लोग तज़्किरे करते हैं अपने प्यारों के
मैं किससे बात करूँ और कहाँ से लाऊँ उसे।(तज़्किरे = चर्चा)
फ़राज़ यांनी लिहिलेल्या आणि मेहदी हसन ह्यांनी गायलेल्या काही गज़ल ह्या कालातीत मास्टरपीस आहेत. त्यात अर्थातच ‘रंजीशही सही…‘ आहेच, तशीच माझी अतिशय आवडती ‘अब के हम बिछड़े…‘ –
अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें
किंवा फ़राज़ यांचीच गुलाम अलींनी गायलेली ‘कठिन है राह-गुज़र थोड़ी देर साथ चलो‘, त्यातला हा शेर –
तमाम उम्र कहाँ कोई साथ देता है
ये जानता हूँ मगर, थोड़ी दूर साथ चलो।
बाकी कोणी साथ द्यायला असो वा नसो, गज़ल सुख-दु:खात नेहमीच साथ निभावत राहिली. कित्येक दु:खी, एकाकी रात्री केवळ गज़ल ऐकतांना सुसह्य झाल्यात. स्वतःच्या सावलीनेही केली नसेल अशी सोबत गज़लेने केलीयं. ही गज़लेची साथ-सोबत, तो प्रवास, याविषयी हसरत जयपुरींनी फार सुरेख लिहिलंय, ‘मुसाफ़िर हैं हम तो चले जा रहे हैं बड़ा ही सुहाना ग़ज़ल का सफ़र है’ –
ना कोई थकन है, न कोई ख़लिश है मोहब्बत की जाने ये कैसी कशिश है।
जिसे देखिए वो चला जा रहा है, जहान-ए-ग़ज़ल की सुहानी डगर है।यही है हमारा ताल्लुक़ ग़ज़ल से हम इसके लिए ये हमारे लिए है।
ये अपनी कहानी ज़माने में ‘हसरत’ सभी को पता है, सभी को ख़बर है।
ह्या लेखाचं शीर्षकही ह्याच गज़लेतून आलंय. अहमद हुसैन, मोहम्मद हुसैन ह्या जयपुरच्याच गज़ल-गायक बंधूंनी ही गज़ल फार प्रेमाने, तितक्याच अल्हाददायक आवाजात गायली आहे. सगळ्याच आवडत्या गज़ल किंवा त्यातल्या काही आवडत्या ओळी लिहायच्या झाल्या, तर अख्खे पुस्तकच लिहावे लागेल. आता हेच लिहायला बसलोय तर कितीतरी गज़ल डोक्यात गर्दी करतात आहे. आठवणी अशा धबधब्यासारख्या कोसळतात आहे. काही प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. कॉलेजमधे एका मित्राला अशीच एकदा ‘नजरबाधा’ झाली होती. तेंव्हा ‘आँखें’ ही थीम घेऊन त्याला कॅसेट बनवायची होती. आम्हीही त्याच्या खोलीत बसून गज़ल ऐकत कित्येक रात्री जागवल्यात, त्याची ती कॅसेट बनवण्यासाठी. खासच झाली होती ती ‘आँखें’ची कॅसेट, मात्र ती ‘इस जहाँ की नहीं हैं तुम्हारी आँखे’ वाली मुलगी शेवटी त्याचा पासवर्ड बनून राहिली. असो, असो. 🙂
पुर्ण कॅसेट/अल्बम विकत घेण्याचे चोचले तेंव्हा फारसे नव्हतेच, अपवाद ‘अर्थ/साथ-साथ’ सारखी एखादी किंवा ग्रॅमीची कॅसेट. तेंव्हा एकतर मित्रांकडून कॅसेट रेकॉर्ड करून घ्यायचो, किंवा डेक्कनच्या लकडी पुलाजवळ एका छोट्याशा कोपर्यात एक कॅसेटवाला होता; तो कुठलीही गाणी मिळवून, रेकॉर्ड करून द्यायचा. त्याच्याकडून कितीतरी खास गाण्यांच्या, गज़लच्या कॅसेट मी रेकॉर्ड करुन घेतल्या होत्या. आजही त्यातल्या कित्येक गज़ल त्याच क्रमाने आठवतात. कुठेही त्यातली एखादी जरी ऐकली तर पुढची माझ्या कॅसेटमधली गज़ल आपोआपच माझ्या मनात सुरु होते. तेंव्हा बनवलेल्या अशाच एका कॅसेटमधे पाठोपाठ येणार्या माझ्या आवडत्या दोन रोमँटीक गज़ला होत्या – जगजित-चित्राने गायलेली सईद राहींची ‘मेरे जैसे बन जाओगे जब इश्क़ तुम्हें हो जाएगा‘ आणि त्यांनीच गायलेली बशीर बद्र यांची ‘सोचा नहीं अच्छा बुरा, देखा सुना कुछ भी नहीं‘. आजही त्यातले शब्द सहजच ओठांवर येतात, मधे कितीतरी वर्षे उलटून गेली असतांना…
त्यावरून आठवले, दोनेक वर्षांपुर्वी मी लडाखला नुब्रा व्हॅलीत गेलो होतो. थकलेल्या मोटारसायकल राईडनंतर पांढर्याशुभ्र वाळूत सूर्यास्त बघत असतांना मनात एक वेगळंच समाधान होतं. तेंव्हा साठीच्या आसपासचं एक वयस्कर जोडपं दिसलं. ते काका-काकू थोडासा वाळूचा ढिगारा चढूनही थकून गेले होते, पण शारिरीक थकव्यापेक्षाही त्या दोघांच्याही चेहर्यावर जाणवत होती एक हताश थकावट – काहितरी गमावल्यासारखी. ते दोघेच लडाखला कशासाठी आले असतील, त्यांना मुलंबाळं असतील का, असली तर ती कुठे असतील, ते एवढे उदास का आहेत असे कित्येक प्रश्न मला पडले. पण अंगभूत भीडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा माझ्यासारख्या तिर्हाईताने त्यांना काय आणि कसे विचारायचे या विचाराने म्हणा, मी प्रत्यक्ष जाऊन काही त्यांच्याशी बोललो नाही. मी दुरूनच त्यांच्याकडे बघत होतो. कित्येक वेळ मावळतीच्या सूर्याकडे बघत ते दोघं त्या वाळूच्या ढिगावर बसून होते, अगदी निशब्द. आयुष्याच्या संध्याकाळी तो सूर्यास्त त्यांच्या डोळ्यातच दिसत होता. मला अचानकच हा शेर आठवला –
इक शाम के दहलीज़ पर बैठे रहे वो देर तक
आँखों से की बातें बहुत मुँह से कहा कुछ भी नहीं(दहलीज़=उंबरठा)
ह्या वयस्कर जोडप्याचेही असेच, “ख़ामोश यादों के सिवा, घर में रहा कुछ भी नहीं…” काही झाले असेल का ह्या विचाराने मी त्या संध्याकाळी अस्वस्थ होत राहिलो. आजकाल ह्या ओळी ऐकतांना त्या संध्याकाळी नुब्रा व्हॅलीत त्या दोघांच्या डोळ्यात पाहिलेला सूर्यास्त आठवत रहातो…
नुब्रा व्हॅलीची त्या वेळेसची अजून एक आठवण आहे. त्याआधी ७-८ वर्षे मी लडाखला मोटरसायकलने जायचा बेत करत होतो, पण काही ना काही कारणाने ते जमतच नव्हते. आदल्या वर्षी तर दिल्लीपर्यंत विमानाची टिकीटेही काढून झाली होती, पण ऐन वेळी मोटारसायकल टूर ऑपरेटरने टूरच रद्द केला. विमानाचे पैसे वाया गेले. ते वैष्णोदेवीचं म्हणतात ना, ‘माता का बुलावा’ आला पाहिजे, तसा शेवटी दोन वर्षांपुर्वी ‘लडाखचा बुलावा’ आला एकदाचा. तिथे गेल्यावर सार्चूच्या अतिथंड वार्याने, वातावरणाने बरेच गळपटले. काहींना ऑक्सिजन सिलेंडर लावावे लागले. एका बंड्याने तर प्रॅक्टिस राईडलाच हात मोडून प्लॅस्टरमधे बांधून घेतला. पोटं सगळ्यांचीच बिघडली होती. आता इतक्या वर्षांनी इथे यायचा योग आलाय तरी राईड पुर्ण करता येईल की नाही याविषयी मनात धाकधूक होती. त्यात सार्चू ते पांग या प्रवासाने माझाही अंत पाहिला होता. चाळीशी आलीयं, यावेळेस नाही जमलं तर पुन्हा येता येईल का, आणि आलोच तर तेंव्हा शरीर साथ देईल का असेही विचार आयुष्यात पहिल्यांदाच मनात येत होते. सुदैवाने नुब्राला पोहोचेपर्यंत माझ्या शरीराने चांगलेच जुळवून घेतले होते, त्यामुळे थकलो होतो तरी समाधान होते. त्या राईडमधे ‘Take me home, country roads…’ हे गाणं (आजूबाजूला ऐकायला कोणी नाही ह्याची खात्री करुन) मनासोक्त गाऊन घेतलं होतं. मनात वेगवेगळे विचार चालूच होते – मी घेतलेले काही वेगळे निर्णय, त्याचे अपरिहार्य फायदे-तोटे, एकटे पडल्याची भावना, वय वाढल्याची जाणीव, अजून काय-काय राहून गेले त्याची हुरहूर असे चक्र चालू होते. नुब्राच्या वाळूत बसलो तेंव्हाही हे विचार डोक्यात पिंगा घालत होते. एका वेगळ्याच ट्रान्समधे होतो. तेंव्हा समोरच्या वाळूच्या ढिगार्यामागून हळूहळू पण अनपेक्षितपणे एक उंटाचा कळप वाळू उडवत वर आला. त्यांनीच उडवलेल्या त्या धुरळ्यामागे एक अतिशय सुरेख देखावा साकारत होता. कॅमेरा सावरून ते टिपतांना मला काय आठवले, तर ह्या ओळी –
चाह तो निकल सकी न, पर उमर निकल गई,
…..
उम्र के चढ़ाव का उतार देखते रहे।
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे।

ते दृश्य, माझी त्यावेळेसची मनःस्थिती आणि गोपाल दास नीरज यांच्या या ओळी – हे सगळं मिळून वेगळ्याच मितीतला एक क्षण मनावर कायमचाच कोरला गेला. आजही ह्या ओळी आठवतात तेंव्हा त्या क्षणांची धूळ माझ्या डोळ्यांत उडत राहते, उगाचच डोळ्यात पाणी येत राहते…
तशाच काही लोभस, मोहक आठवणीही आहेत. लडाखमधेच पँगाँग लेकजवळ तंबूत राहिलो होतो. सकाळी आकाशाचे आणि लेकचेही सुरेख फोटो मिळतील म्हणून सूर्योदयापुर्वीच हाडं गोठवणार्या थंडीत कुडकुडत उठलो. त्या पहाटेच्या वेळी तिथल्या अथांग काळ्या आकाशात चांदण्यांचा अक्षरशः खच पडला होता. आकाशात इतक्या चांदण्या असू शकतात ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मी कधीच एवढ्या चांदण्या पाहिल्या नव्हत्या. काळ्याशार पँगाँग लेकमधयेही ते प्रतिबिंब हळूवार हलत होते. लांबवर कुठेतरी आंधारात आकाश लेकमधे विरघळत होते. वर-खाली सगळीकडेच चांदणे पसरल्यासारखे काहितरी surreal, भासमय वातावरण निर्माण झाले होते. तेंव्हाच कुठलेतरी नक्षत्र उगवत होते की मावळत होते – अॅस्ट्रोनॉमी कळणार्या एका ग्रुपमधे त्यावर चर्चा चालू होती. माझे तिकडे फारसे लक्ष नव्हते. मी ते सगळे तारे माझेच असल्यासारखा मी त्यांच्याकडे पाहत होतो (सा.न. धामणस्कर), ते नक्षत्रांचे देणे डोळ्यात साठवून घेत होतो. तिथे जाणवणारी ती थंडी, त्यात हुळहुळणारे नाक, लेकच्या पाण्याचा तो विशिष्ट वास, पाण्याचा अगदी हलका आवाज, आणि ते अथांग-अफाट आकाश हा सर्वांगाने भिडणारा अनुभव साठवायला आपला कॅमेरा किती थिटा आहे हे जाणवून हळहळतही होतो. सूर्य एखाद्या अनुरक्त प्रियकरासारखा हळूवारपणे पँगाँगची निळाई सजवत, निरखत उगवला. आपापल्या कैफात रात्रभर चकाकणारे अगणित तारे हळूहळू त्या आकाशात विरून गेले, जाताजाता सुरेश भटांच्या ‘केंव्हातरी पहाटे‘ ह्या गज़लेच्या काही ओळी माझ्यासाठी उलगडून गेले…
उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!
अचानक चमकले, अरे एक्झॅक्टली हाच तर तो अनुभव! भटांनीही पाहिले असेल का हे आकाश? कवितेच्या ओळी जाणवण्याचे असे काही लख्ख क्षण पदरात पडतात तेंव्हा काय वाटतं हे खरंच नाही सांगता येत.
भटांच्या ‘केंव्हातरी पहाटे’ वरून आठवले, लग्नाळलेल्या दिवसात, अशाच एका सकाळी आंघोळ करतांना सहजच गुणगुणायला लागलो…
तुझको छू लूँ तो फ़िर ए जान-ए-तमन्ना मुझको
देर तक अपने बदन से तेरी ख़ुशबू आये
ते शब्द नेणीवेतून ओठांवर कुठल्या गंधाने आलेत हे जाणवून अंगावर सरसरून काटा आला होता. तो गंध, ह्या ओळी आणि तो अंगावर सरसरून आलेला काटा ह्यातून ही गज़ल एक खाजगी, जिव्हाळ्याची आठवण बनून मनात घर करून बसली आहे. Moments that take your breath away ह्या अशा काव्यमय सुरावटी घेऊन येतात. शेवटच्या श्वासानंतरही ह्या आठवणी रेंगाळतील कदाचित, गंध होऊन, सुरावटी होऊन…
खरं तर मुळात आपण त्यांना विसरलो हेही विसरलेल्या कविता, गज़ल, गाणी अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट कशी प्रकटतात हे अनाकलनीय आहे. नुसत्याच वाचलेल्या कवितांपेक्षा चाली लावलेल्या कविता, सुरांचा साज ल्यालेली गाणी, गज़ल अर्थातच खोलवर परिणाम करून जातात. आपल्या नेणीवेच्या खोल, अंधार्या डोहात काय, काय चालते त्याचा थांग लागत नाही. रिसर्च असे म्हणतो की टीनेजमधे जे संगीत आपण ऐकतो ते कायमच मनात घर करून राहते –
Why do the songs I heard when I was teenager sound sweeter than anything I listen to as an adult? In recent years, psychologists and neuroscientists have confirmed that these songs hold disproportionate power over our emotions. And researchers have uncovered evidence that suggests our brains bind us to the music we heard as teenagers more tightly than anything we’ll hear as adults – a connection that doesn’t weaken as we age. Musical nostalgia, in other words, isn’t just a cultural phenomenon: It’s a neuronic command.
~ Excerpts from Musical Nostalgia
वर्षानुवर्षे हव्याहव्याशा सुरांच्या, स्वरांच्या साथीने कानावर पडलेले शब्द, कानातून जाणिवेत पोहोचत असतील. मग तिथून कधीतरी ते नकळतच नेणीवेत जात असावेत आणि तिथेच राहत असावेत अनंत काळ; अगदी जाणिवांमधून पुसल्यानंतरही. कुठल्यातरी स्पर्शाने, चवीने, गंधाने, सुरांनी किंवा अजून कशाने – नेणीवेत काहितरी उलथापालथ होते आणि त्या खोल डोहातून अवचितच असे काहितरी वर येते. वर्षानुवर्षे झिरपलेल्या, आपल्या मातीत मुरलेल्या शब्दांना कधीतरी झरे फुटणारच ना?
स्वतः कविता लिहित नसलो, वाचत नसलो किंवा फार आवडीने गज़ल, गाणी ऐकत नसलो तरीही आपल्या सगळ्यांच्या मनात एक हळवा कोपरा असतोच. अगदी व्यवहारी, वरकरणी रुक्ष वाटणार्या माणसांमधेही कुठेतरी हा ओलावा असतो. कधीतरी अनाहुतपणे एखादा सूर, एखादा स्वर, किंवा एखादा शेर, गाणे, कवितेच्या काही ओळी सगळे अडथळे ओलांडून काळजावर घाव घालतात, आणि मग पाझर फुटतो. मैफिलीत असे पाझर फुटलेले डोळे हळूच पुसतांना पाहिले की फार बरं वाटतं. कविता, गज़ल ही अशाच ओलाव्यात रुजते आणि आपली होते.
आणि पाझर फुटतो, तेंव्हा तो केंव्हा, कुठे आणि कसा फुटेल हे कसे सांगणार? शेवटचा एक किस्सा सांगतो. मी फारसा देव-देव करत नाही. अगदी दीवार मधला बच्चन नसलो तरीही मंदिरात मी क्वचितच जायचो. काही वर्षांपुर्वी एका अकल्पित समस्येमुळे त्रासलो होतो. कुठेच मदत मिळत नव्हती, काहीच मार्ग दिसत नव्हता. शेवटी अगदी हताश होऊन, उद्विग्न मनाने एका मंदिरात मुर्तीसमोर हात जोडले तेंव्हा हे सगळे किती खोलवर पाझरले आहे हे जाणवून शहारलो. कसे, कुठून आले कोणास ठाऊक, पण प्रार्थनेऐवजी अभावितपणे हेच ओठांवर आले –
तुम भी उस वक़्त याद आते हो
जब कोई आसरा नहीं होता…
तो चौसष्ट कलांचा अधिपती, त्यालाही ही अशी प्रार्थना आवडत असेलच ना? 🙂
हा लेख मिसळपाव ह्या दिवाळी अंकातही (2019) प्रसिध्द झाला आहे.


किती सुंदर लिहिलं आहे आणि तुमचं वाचन अफाट आहे, विविध छंद जोपासता येणं, हा शिकण्या सारखं आहे.
मी भाग्यवान आहे की माझ्या घरी मला खूप असं विविध एकायला मिळालं. माझ्या आईला मधू शाला तोंड पाठ आहे ☺️
संगीत तुम्हाला हरवून टाकतो आणि बरेचदा शोधून पण देतो.
मजा आला आणि खूप आठवणी मनात रेंगाळलल्या.
Thank you __/\__