Feeds:
Posts
Comments

Well, I am not really in market as of today to buy a Skoda, but have been reading horror stories about Harish’s experience on Team-BHP in last few days, and I am really horrified to say the least. He mentions that in his Skoda, parts worth almost Rs. 4 Lacs (Yes, INR 400,000) were replaced by spurious parts by the dealer, and Skoda just washed their hands off it. You can read the whole story here -
http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/54881-skoda-dealer-changes-parts-my-car-consumer-court-car-not-returned-year.html

Moreover, it seems that it is not just one off exception. Many people have reported on Team-BHP forums about their horror experience about Skoda and its After Sales Service. In fact, Team-BHP has decided to stand up for the truth and they are prominently putting it up in a separate thread on their forum. You can read about it here -
http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/55796-team-bhp-stands-truth-but-skoda-wants-instigate-team-bhp-its-users.html

There are just too many bad experiences posted by different people to shrug it off -
http://www.team-bhp.com/forum/technical-stuff/56107-skoda-trouble-uh-oh.html
http://www.consumercomplaints.in/complaints/constant-problem-with-engine-c29800.html
http://www.consumercomplaints.in/complaints/skoda-fabia-c153945.html

You read, and decide yourself if some Auto Manufacturers are indeed taking premium Indian customers for a ride! As for me, I really do not know real facts of this matter; but I have decided that I’ll never, ever buy a Skoda in my life!

क्षिप्रा कडून खो मिळून बरेच दिवस झाले पण लिहायला जमतच नव्हते. शेवटी आज योग आला.

“देणे समाजाचे” खरच फारच मोठा शब्द आहे. पण आपल्यापैकी खूपजणांना असे वाटते की दुसर्‍याठी आपल्या परीने जेवढे जमेल तेवढे काहितरी तरी करावे. मी पण अशाच पेचात होतो. मध्यंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळघरात जाऊन तेथल्या मुलांना थोडाफार कॉम्प्युटर शिकवला तेव्हाच जाणवले की आपल्याला जे अगदी बेसिक वाटते ते दुसर्‍या क्षेत्रातील माणसाला नवीन असू शकते. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते त्यांना खूप उपयोगीही पडू शकते हे पाहून फारच छान वाटले!

आपले थोडेबहुत ज्ञान, थोडीशी मदत दुसर्‍या कोणाला खूप उपयोगी पडू शकते हा अनुभव खूपच उत्साहवर्धक होता. त्यातुनच मग बरेच दिवस चर्चेत असलेल्या अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीच्या “पैसा फंड/बचत गट” ह्या कल्पनेनी उचल खाल्ली आणि शेवटी काही guidelines ठरवून स्टेट बॅंकेत ह्या बचत गटाचे खाते उघडले. आम्ही ७-८ जण (मी, अजित, अमित, यशोदा, मयूर, गीतांजली, रूपाली, संदीप आणि तेजश्री) ह्या गटाचे core members आहोत आणि स्वत: जमेल तसे पैसे ह्या खात्यात भरतो, त्याशिवाय इतरांनाही ह्या उपक्रमाची माहिती देऊन जर त्यांची इच्छा असेल तर त्यांचीही मदत ह्या खात्यात जमा करतो. इथे १००% पारदर्शकता असेल हे आम्ही स्थापनेपासूनच ठरवले होते आणि त्यानुसारच प्रत्येक महिन्याचे account statement हे अनिल अवचट ब्लॉगवर तसेच अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीवर प्रसिद्ध करतो.

बर्‍याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे आणि आम्हीही सध्या २ संस्थांना आर्थिक मदत करायची ठरवली आहे. त्यापैकी एक आहे – खेळघर, ही संस्था गरीब वस्तीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करते आणि खूप चांगल्या तर्‍हेने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते. दुसरी संस्था आहे – निराधार बालसंगोपन अनाथ केंद्र – दापोडी जिथे मालनताई ह्या लहान अनाथ मुलांची जिवापाड काळजी घेतात. आमच्यापैकी कोणी ना कोणी ह्या दोन्ही संस्थांशी चांगलेच परीचित आहोत, आम्ही स्वत: तिथे जाऊन त्यांचे काम पाहिले आहे, त्यांच्याशी बोललो आहे आणि ह्या दोन्ही संस्था चांगल्या आहेत हे अनुभवले आहे. सध्या ह्या दोन्ही संस्थांना ६ महिन्यासाठी मदत करायचे आम्ही ठरवले आहे!

ही नुकतीच सुरुवात झाली आहे, आणि जिथे आमच्या छोट्या मदतीनेही फरक पडेल तिथे जमेल तशी मदत करायची आमची इच्छा आहे. पैशापलिकडेही जाऊन जर प्रत्यक्ष तिथल्या कामात, प्रकल्पात (जसे वेबसाईट तयार करून देणे, काही इतर तांत्रिक मदत पुरवणे वगैरे) प्रत्यक्ष मदत करता आली तर आम्हाला अधिक आवडेल. फक्त आम्हीच नाही, तर अशा मदतीची इच्छा/गरज असलेल्या व्यक्तिंना आणि संस्थाना एकमेकाची माहिती पुरवणे अशा प्रकारे दुवा बनायलाही आम्हाला आवडेल.

मला ह्या सगळ्यातुन मिळणारा आनंद खूप निर्भेळ, उत्साहवर्धक आहे. खरं तर हे करायचे ते दुसर्‍या कोणासाठी नाही; तर डॉ. आनंद नाडकर्णी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याच ‘भावनिक स्वार्थासाठी’! :)


बचत गट/पैसा फंडाविषयी जास्त माहिती अनिल अवचट ब्लॉगवर इथे वाचता येईल – बचत गट
आणि मदत करायची असल्यास सगळी माहिती तिथे उपलब्ध आहे. जर पैसा बचत गटाला न देता कुठल्याही संस्थेला थेट मदत करायची असेल तरीसुद्धा संपर्क करा, आम्ही जमेल ती सगळी मदत करू! गरजू आणि चांगल्या कामांना पैसा मिळावा अशी आमची इच्छा आहे, तो पैसा आमच्याच कडून मिळावा हे जरूरी नाही!

९ ऑक्टोबरच्या सकाळची ‘आमच्यावर का कायद्याचा उलटा आसूड उगारला जातो आहे?
ही बातमी वाचली आणि पाठोपाठ पोलिसांची ‘कारवाई बरोबरच आहे’ ही मल्लीनाथी वाचली. वाचून खेदही झाला आणि संतापही आला. अर्थात, सामान्य माणसाला पोलीसांकडून त्रास होण्याची ही पहिलीच (आणि दुर्दैवाने शेवटचीही नाही) घटना नाही, पण या निमित्ताने एकूणच पोलीसांच्या कार्यपद्ध्तीबद्द्ल आणि मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते.

गेल्या काही दिवसातील उदाहरणावरून पोलीस, मग ते वाहतूक पोलीस असोत वा खाकी वर्दीतील; ते आपल्या मर्यादित अधिकारांचा अमर्याद दुरुपयोग करतांना दिसून येत आहे. मग ते नो-पार्किंग मधली वाहने उचलतांना असो की आत्महत्येच्या घटनेचा शोध करणे असो. शिवाय पोलीस-वकिलांतील हाणामारीच्या घटनांमुळे तर शरमेने मान खाली घालावी लागते. वकिलांनी मारहाण केली तर पोलीसांनी ‘ईंट का जवाब पत्थरसे’ म्हणत आपली ताकद दाखवली. दोन्ही न्यायव्यवस्थेतील जवाबदार (??? असो!) आणि महत्वाचे घटक; ही लोक म्हणे कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणार! जर कायदा धाब्यावर बसून महाराष्ट्रात, पुण्यासारख्या ठिकाणी कायद्याचे घटकच असे वागू लागले तर मग कशाला उत्तरेकडील मागासलेल्या राज्यांना नावे ठेवायची?

पोलीसांचा धाक किंवा जरब फक्त मध्यमवर्गीय, सरळमार्गी लोकांनाच राहिली आहे, झेब्रा क्रॉसिंगवरच्या दुचाकी वाहनांवर कारवाई करणार्‍या तत्पर पोलीसांनी नो-एंट्रीत शिरलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या स्कॉर्पिओवर कारवाई करावी म्हणून एका महिलेने पुण्यात दिड तास प्रयत्न केल्याचे वाचल्याचे स्मरते. सामान्य माणसाचे कायद्याचे अज्ञान आणि कायद्याची भीती यामुळे ‘पोलीसी खाक्या’ अधिकाअधिक बळावतो आहे. कायद्याचा बडगा तत्परतेने सामान्य मानसाला दखवणारे तथाकथित कायद्याचे रक्षक त्याच तत्परतेने किंबहुना त्यापेक्षाही अधिक तत्परतेने धनदांडग्यांना किंवा राजकीय व्यक्तिंना कायद्यातील पळवाटा शोधून ‘क्लीन चीट’ देतात.

नुकत्याच एका प्रसंगामुळे ह्या पोलीस यंत्रणेचा आणि तपासाचा अतिशय उद्वेगजनक अनुभव आला. किती निष्काळजीपणे आणि तर्क-विसंगत तपास होतो हे जवळून पहायला, अनुभवायला मिळाले. त्यांच्या ज्ञानाच्या, माहितीच्या आणि विचार करण्याच्या मर्यादांचा जवळून परिचय झाला. ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त बोलत नाही, पण उदाहरणच द्यायचे झाले तर समजा ‘वाघमारे’ नावाच्या व्यक्तिने एखादा गुन्हा केला आणि त्या जागेवर फाटून पडलेल्या त्याच्या अर्धवट कार्डवर ‘वाघ’ एवढीच अक्षरे दिसत आहेत – तर एका अबक ठाण्याचे हवालदार बदललेले पत्ते शोधून आणि ‘सखोल तपास’ करून ‘वाघ’ ह्यांना पकडणार आणि विचारणार, “बोला, त्या दिवशी, त्या वेळी तुम्ही कुठे होता?” जर वाघ भारताबाहेर असेल तर ठीक, नाहीतर त्याच्या इतर कुठल्याही स्पष्टीकरणांना; “तुम्ही कुठूनही पत्र आणाल हो, त्याला काही महत्व नाही. ते पुरावे तुम्ही कोर्टातच द्या!” असे म्हणून त्याला आरोपी करून केस चालू शकते. तो बिचारा वाघ जर त्या दिवशी मस्त घरीच लोळून टि. व्ही. पाहत असेल तर त्याच्यासारखा पुरावा नसलेला दुर्दैवी तोच! ह्याला “हॅ! असें कुठे होतं का?” असा विनोद समजू नका. अशा प्रकारे ‘तपास’ करून निरपराध माणसाला अटक होऊ शकते आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे त्यापुढे त्यावर ३-४ वर्षे न्यायालयात केसही चाली शकते. आणि अशा एनकाऊंटरच्या बातम्या वाचून तर फक्त डोक सुन्न होते, मुंबई बॉंब ब्लास्टच्या वेळेस झालेल्या अशा ‘चौकशांच्या’ आणि कुप्रसिद्ध एनकाऊंटरच्या कथा सर्वश्रुत आहेत.

ह्या झाल्या साध्या गुन्ह्यांच्या तपासाच्या कथा. बॉंब ब्लास्टच्या किंवा अतिरेकी कारवायांचा तपास करण्यात तरी पोलीस निदान बुद्धिमान आधिकार्‍यांची निवड करत असतील असे वाटते, तिथे तरी आरोपात थोडेफार तथ्य असावे अशी आशा आहे; पण खात्री नाही. नुकत्याच अटक झालेल्या ‘मोहम्म्द मन्सूर असगर पीरभॉय’ च्या संदर्भात हे प्रकर्षाने जाणवते. हा मुलगा १० वीत आणि १२ वीत ९०% च्या वर मार्क्स मिळवलेला आणि आज १९ लाखांचे पॅकेज मिळवणारा सॉफ्ट्वेअर इंजिनिअर आहे. हा अशा कारवाया करेल की नाही हे त्याला न ओळखणार्‍यांना नाही सांगता येत पण त्याच्या शेजार्‍याची मते आणि त्यांच्या कार फोडल्याच्या बातम्या ह्यावरून पोलिसांचा तपास किती खरा/बरोबर आहे ही शंका नक्कीच मनात येते! पोलीसांची ही अजून एक चूक असू नये अशी इच्छा! खरे काय आहे हे कदाचित आपल्याला कधीच माहित होणार नाही; पण खर्‍याला न्याय मिळावा ही आशा आणि सदिच्छा!

दुर्दैवाने आपल्या समाजात आरोपी (accused) आणि गुन्हेगार (convicted) ह्यांच्यात फरक केला जात नाही. पोलिसांनी पकडलेला तथाकथित आरोपी नंतर (अपरिहार्य आणि अक्षम्य अशा दीर्घ कालावधीनंतर आणि मनस्तापानंतर) न्यायालयात सुटला, तरी आपण संशयाने पहात राहतो. असे ऐकले आहे की क्रिमिनल केसेस मधे शिक्षा होण्याचे प्रमाण १०% इतके कमी आहे, दुसर्‍या शब्दात ९०% ‘आरोपी’ सुटतात. आधी वाटायचे की असे कसे हे गुन्हेगार मोकळे सुटतात? पण आता जाणवते की मी (आणि आपल्यातले कित्येकजण) काहिही तपशील माहित नसतांना आरोपींनाच गुन्हेगार समजत होतो आणि ताशेरे मारत होतो. आता पोलीसांच्या तपासाची पद्धत पाहिल्यानंतर असे वाटते, की जर असेच ते बहुतेक वेळा चोर सोडून संन्याशाला पकडत असतील तर तो बिचारा संन्याशी सुटलेलाच बरा! आपल्या वरच्या उदाहरणात बिचारे मि. वाघ सुटलेले बरे नाही का? वाघमारेंना विसरा – कार्ड अर्धवट असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुरावाच नाही; त्यामुळे त्यांना पकडणार तरी कसे?

पोलीसांवर खूप ताण आणि दबाव येतो ह्याची पूर्ण कल्पना असूनही त्यांच्या वर्तवणूकीचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांच्यावर असलेला ताण, कामाचा, बंदोबस्ताचा अतिरिक्त व्याप हा कमी व्हावा हे नक्की, पण म्हणून त्यांच्या दुसर्‍याच्या आयुष्याशी खेळणार्‍या चुका शासनाने पाठीशी घालाव्यात हे अजिबात मान्य नाही. मी पोलीस आहे, मला ताण आहे म्हणून मी एखाद्याला चुकीने गोळी घालणार किंवा सूड्बुद्धीने आत घालून हात साफ करणार हे चालणार नाही. ताण संगणक अभियंत्यांनाही आहे – त्यातूनच काही आत्महत्या झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या. ताण डॉक्टरांनाही आहे, पण म्हणून समजा डोळ्याच्या डॉक्टरने उद्या ‘चुकीने’ डाव्या डोळ्याच्या ऐवजी उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली तर काय गदारोळ होईल? अशा वेळी बेजवाबदारपणाबद्द्ल संबधित व्यक्तिला योग्य शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि हाच न्याय पोलिसांनाही वापरावा.

सध्याच्या काही घटना व अनुभवांवरून वाटते की पोलिसांच्या तपासातील त्रुटींमुळे, हलगर्जीपणामुळे, मर्यांदांमुळे आणि मनमानीपणामुळे कित्येक निरपराध लोकांना असह्य मनस्ताप होतो आहे. ह्या पार्शवभूमीवर असे वाटते की पोलिसांना जनतेला ‘उत्तर द्यायची जवाबदारी’ (accountability) असलीच पाहिजे. जर चुकीच्या व्यक्तिला आरोपी केल्याचे लक्षात आले, तर संबधित तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यास बडतर्फ करावे असे वाटते. पण ह्याचा परिणाम म्हणून पुढे पोलिस सूडबुद्धीने वागतील अशी रास्त भीतीही वाटते (उदा. पोलीस-वकिलांतील हाणामारी). सध्या पोलिस आपल्या मर्यादित अधिकारांचा अमर्याद दुरुपयोग करतांना दिसत आहेत. सामान्य माणूस अशा कटू अनुभवांनी आयुष्यातून उठू शकतो! अशा वेळेस सामान्य माणसाला वाली कोण? अशा वेळेस सामान्य माणसाला त्रास होऊ नये आणि पोलिस यंत्रणेत, तपासात सकारत्मक सुधारणा व्हाव्यात म्हणुन काही गोष्टी सुचवाव्याश्या वाटतात -

  • न्यायालयांनीही पोलिसांच्या अधिकारांना मर्यादा आणाव्यात, तसेच त्याच्या दुरुपयोगाबाबत पोलिसांना कडक शासन व्हावे. आणि हे फक्त कागदावर न रहाता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी.
  • एखाद्या ‘पोलिस अत्याचार निवारण’ मंचाची स्थापना व्हावी आणि जेष्ठ कायदेतज्ञ मंडळींची ह्यासाठी मदत करावी – ह्या संस्थेकडून अशा वेळेस मोफत किंवा अल्प दरात कयदेशीर सल्ला उपलब्ध व्हावा. (अशी एखादी संस्था अस्तित्वात असल्यास, मला माहिती नाही हे माझे अज्ञान). ह्याची खरच गरज आहे.
  • पोलिसांच्या प्रशिक्षणाचा, किंबहुना स्वत: पोलिस अधिकार्‍यांचा, शिपायांचा, हवालदारांचा दर्जा वाढवण्यासाठी लवकरात, लवकर पावले उचलावीत. ह्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी आणि त्यांचे प्रशिक्षक ह्यांची अवश्य मदत घ्यावी. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांची मानसिकता बदलेल व ते पुर्वग्रह बाजुळा ठेवून non-judgmental (योग्य मराठी शब्द सापडत नाही.) पद्ध्तीने काम करतील अशी व्यवस्था हवी. ज्यामुळे सर्वसामान्य नागरीक आणि पोलिस ह्यांच्यातला दुरावा कमी होईल

पोलिसांविषयी असे म्हणतात की परदेशात, ‘They teat you like a gentleman unless you behave otherwise, here they treat you like a crook unless you prove otherwise!’ ह्याविषयी सावरकारंचा किस्साही प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने आपल्या इथे पोलिस आजही भीती दाखवायची गोष्ट आहे, आणि त्याला बहुतांशी पोलिसांची वागणूकच कारणीभूत आहे. जनमानसातील पोलिसांची प्रतिमा बदलायची असेल, उंचवायची असेल तर पोलिसांची मानसिकता हवालदारापासून ते उच्चपदस्थांपर्यंत बदलणे आवश्यक आहे. आज पोलिसांच्या विश्वासार्हतेवर एक मोठे प्रश्न्चिन्ह उभे आहे. त्यांची अरेरावी, मनमानी अशीच सुरु राहिली तर उत्तरेकडील काही राज्यांप्रमाणे आपल्याकडेही अराजक येऊ शकते; त्यामुळे गरज आहे ते आत्ताच काही पाऊले उचलण्याची. शासन काही करेल ह्याची वाट न बघता ह्यासाठी लोकांनीच आपल्या पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत, ते लोकाभिमुख कसे होतील ह्याविषयीचे आपले विचार सविस्तर आणि प्रभावीपणे विविध व्यासपीठांवर मांडण्याची – शासन आणि पोलिसातील उच्चपदस्थांना शेवटी त्याची दखल घ्यावीच लागेल.

तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते? महाजलावरील मिसळपाव.कॉम सारख्या लोकप्रिय संस्थळांचे आणि तेथील लेखांचे एक महत्वाचे बलस्थान म्हणजे वाचकांशी होणारा सुलभ, दुहेरी संवाद (interactive communication), जिथे आपल्या विचारांना, प्रतिसादाला मुळ लेखाइतकेच महत्व आहे. पोलिसांवर आपण सगळेच टीका करतो, आणि ती बहुतेक वेळा सकारणही असते. ह्या निमित्ताने टीकेबरोबरच तुमचे स्वत:चे अनुभव, पोलिसांच्या कार्यपद्ध्तींविषयी तुमच्या अपेक्षा/सुचना आणि अर्थातच ह्या अग्रलेखाविषयी बर्‍यावाईट प्रतिक्रिया इथे अवश्य लिहा.


This article was published on misalpav.com on 19th Oct 2008, and the same is published here.

मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला – ‘डोंबिवली फास्ट’. चित्रपट फारच सुरेख जमलाय…मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही….फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.

सुचना/Disclaimer – Spoilers ahead! आणि हे वस्तुनिष्ठ, तटस्थ वगैरे परिक्षण नाही, सिनेमा खूप आवडला, म्हणून लिहिले! Nothing objective about it!

चित्रपट ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमधे झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात डोकावून बघतो. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा १००% तुमच्या-आमच्यासारखी माणसे वाटतात आणि तुमच्या-आमच्यासारखीच वागतात. सगळ्याच व्यक्तिरेखा फार सुरेख, तपशीलात लिहिल्यात आणि तितक्याच सशक्तपणे त्या पडद्यावर त्या-त्या कलाकारांनी निभावल्यात – चित्रपटाचे कास्टिंग हे चित्रपटाचे एक महत्वाचे बलस्थान – सगळेच कलाकार त्या-त्या व्यक्तिरेखाच वाटतात. अगदी माधवन पण फार हिरोगिरी न करता प्रामाणिकपणे भुमिकेत शिरतो आणि त्याहून महत्वाचे म्हणजे (नेहमीप्रमाणे चुकार मुलासारखा बाहेर न पडता) बहुतांश वेळ भुमिकेतच राहतो! Wink

ह्यातील पात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाला साजेशी वागत राहतात, आणि त्यातून निर्माण होते ते नाट्य, आणि या सगळ्याच्या पार्श्वभुमीला हादरवून सोडणार्‍या बॉम्बस्फोटांचा अनुभव! चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो, आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवतो! ह्यात वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आहे – -आणि मुंबई ह्या एका धाग्याने त्यांना सहजपणे बांधून ठेवले आहे. लोकलमधील बाँबस्फोट ह्या एकाच अनुभवाचे त्यांच्या भावविश्वात वेगवेगळे पडसाद उमटलेत.

माधवन हा एक उच्च-मध्यमवर्गीय, पर्यावरण, सार्वजनिक वाह्तूकीचे फायदे ह्यांची जाणीव असलेला, एक कॉर्पोरेट नोकरीपेशा माणूस. योगायोगाने त्या दिवशी सेकंड क्लास मधे बसतो आणि म्हणूनच वाचतो…पण ह्या अनुभवाने पुर्णपणे हादरून जातो…त्याची बायको प्रेग्नंट…तो ऑनसाईट बद्दल विचार करु लागतो…गाडीच्या शोरुम मधे जाऊन गाडी विकत घ्यायचा विचार करू लागतो…लोकलविषयी एक अनामिक भीती मनात बसते…

दुसरा असाच साधा, गरीब केरळी चहावाला – इरफान….त्याच्या जीवनात तसा फारसा फरक पडला नाही, पण पुर्वी एकदा मॉल मधे पत्नी व मुलीबरोबर झालेल्या अपमानाचा बदला घ्ययचा म्हणून फोनवरून मॉलमधे बाँब ठेवल्याच्या खोट्याच बातम्या देतो..आणि ते खाली होणारे मॉल, भयभीत उच्चवर्णीय लोग बघून आसूरी आनंद घेत असतो, आणि असाच एक दिवशी त्याला त्याच्या अफवांचे गांभीर्य कळते…. (नाही, नाही – त्याची मुलगी चिरडत वगैरे नाही….असेच बाळबोध cliché निशिकांतने टाळलेत!)…फारशे संवाद नसले तरी इरफानने ही भुमिका फारच छान केली आहे! केरळी टच ही त्याची आयडीआ होती म्हणे!

तिसरी सोहा-अली-खान, ही ‘खोया खोया चांद’ पासून अभिनेत्री म्हणून बरीच प्रगल्भ झाली आहे. तर ही (अशाच) एका न्यूज चॅनलची रिपोर्टर…तोच कुप्रसिद्ध प्रश्न ‘आप को इस वक्त कैसा लग रहा है?’ विचारणारी…तिचा भावी जोडीदार (समीर धर्माधिकारी) ह्या बाँबस्फोटात मरण पावतो आणि तिच्या न्यूज चॅनलवर तिलाच ह्या प्रश्नाला सामोरे जावे लागते…नंतर तिच्यावर ‘रुपाली बनी रुदाली’ अशी स्टोरी बनवली जाते…ही तिच्या आयुष्यातली उलथापालथ!

चौथा बेकार, मित्रांबरोबर टवाळक्या करणारा, मुस्लिमद्वेष्टा सुरेश; के के मेनन – त्याने ह्याही भुमिकेचे सोने केले आहे….त्याला कुठल्याही भुमिकेत टाकले तरी तो १००% निभावतो….तर हा असाच एक चहाच्या दुकानात टाइमपास करणारा मुलगा… बॉम्बस्फोटांनंतर तर अधिकच कट्टर होतो….शेजारच्या टेबलावर बसणारा युसुफ त्या दिवसानंतर दिसत नाही, तर ह्याचा संशय अजूनच बळावतो…तो मग त्याचा माग काढतो, घर शोधतो…तो सगळाच सिक्वेंस छान घेतलाय…त्याचे छोटे, छोटे संवाद ‘ये लोग किशोरकुमार कभी नहीं सुनेंगे’, किंवा पटकन ओंकार असलेले लॉकेट लपवणे, नजरेनेच ‘बघ मी सांगत नव्हतो तुला?’ असे मित्राकडे बघणे…सगळेच दाद देण्यासारखे. के के मेनन ग्रेटच आहे, आणि तितकीच दाद निशिकांत च्या टेकींगला!

आणि शेवटी पाचवा ह्या सगळ्यांना वरताण – हवालदार तुकाराम पाटील; परेश रावल! हा अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक (याचा अर्थ बाकीचे सूमार आहेत असा अजिबात नाही. खर तर के के मेनन आणि परेश रावल मधे डावे-उजवे करणे अवघड आहे!)…ह्या हवालदाराला रिटायरमेंटला काहिच दिवस राहिलेत…त्यातच ही घटना घडते…तिथे कदम नावचा एक नवीनच हवालदार भरती झाला आहे…ह्या पात्राचेही एक उप-कथानक आहे…त्याची हनीमूनची सुट्टी बॉम्बस्फोटांमुळे कँन्सल होते…त्यामुळे तो चिडलेला….मग त्या अनुषंगाने येणारे पोलिसांचे किस्से, त्यांचा तपास…नागरिकांशी संवाद…त्या हवालदार तुकाराम पाटीलला येणारी क्षुद्रतेची (insignificant असल्याची), वैफल्याची भावना त्यावर त्याचा विनोदाचा उतारा, आणि ह्या सगळ्या पलिकडे दिसणारा त्याचा कनवाळू समजूतदारपणा…ही भुमिका परेश रावलने अफलातून केली आहे. हा माणूस खरच अशक्य आहे….त्याचे पोलीस स्टेशनमधले शेवटचे भाषण, के के मेननला व्हॅन मधे बोलवतो तो प्रसंग…हे सगळेच अफाट….काहिही विशेष प्रयत्न न करता हा माणूस फक्त ‘हवालदार तुकाराम पाटील’ वाटतो! परेशला फक्त जागेवरूनच सलाम! बॉस, तुम सचमुच मे बहुत बडा आदमी है बे!

ह्या सगळ्यात जाणवणारी निशिकांतची दिग्दर्शक म्हणून प्रगल्भ समज आणि ह्या माध्यमाची अनन्यसाधारण जाण- ह्याचा हा फक्त दुसरा चित्रपट आहे हे सांगूनही खरे वाटत नाही! सगळ्यात महत्वाचे त्याने निवडलेली पटकथेची व्याप्ती आणि त्याची ट्रीटमेंट – फिल्मी होण्यासारखे खूप प्रसंग, उपकथानक असूनही त्याने तो मोह टाळला आहे. तसेच आपल्याला ह्या चित्रपटात अशा घटनांचा तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर होणारा परिणाम एवढेच (आणि फक्त तेवढेच) दाखवायचे आहे हे त्याने पक्के ठरवले आहे – आणि म्हणूनच ते तो तो खूप परिणामकाररित्या दाखवू शकला आहे – मला वाटते हे त्याचे यश खूप मोठे आहे. त्याची प्रतिके, त्याचे भाष्य हे खूप सहजपणे चित्रपटाचा भाग म्हणून येते – ते प्रसंग मुद्दाम घुसवल्यासारखे, किंवा बटबटीतपणे ठिगळासारखे येत नाहीत (बटवटीतपणाच्या बटबटीत उदाहरणासाठी आठवा इंद्रकुमार इराणी साहेबांचा ‘बेटा’, कुंभाराचे चाक, ओली माती…नुसता वैताग!!!!)…कित्येकवेळा तो हे खूप प्रभावीपणे संवादाशिवायही जाणवून देतो.

एक प्रसंग — सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात…ते बोलत असतात…कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो….कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो…मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत…बॉसचे बोलणे संपते…तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात….

तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या जीवनात बॉम्बस्फोटांमुळे वेगवेगळ्या तर्‍हेने उलथापालथ होते…त्यांचे भावविश्व ढवळून निघते….यथावकाश, आपापल्या परीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी ती पात्रे सावरतात, भानावर येतात…तशीच महानगरी मुंबईही आपल्या रुळांवर चालू लागते….त्यांना आणि त्यांच्यावरोबरच ह्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार (खर तर भागीदार म्हणावे इतका चित्रपट सुरेख/वास्तवदर्शी झाला आहे) असलेल्या आपल्यालाही जाणवते….की जीवन अपरिहार्यपणे पुढे जातच राहते! आणि ही जाणीव एक बधीर, भावनाशून्य जाणीव नसते, तर ती असते एक सहृदय, समंजस, ओली जाणीव….

(मास्तरांच्या भाषेत सांगायचे तर) चित्रपटाचे प्रिमाईस एका ओळीचे – Life still goes on… आणि कुठेही शब्दबंबाळ, अतिरेक न करता ‘मुंबई मेरी जान’ हे सहजपणे आपल्याला जाणवून देतो. बॉम्बस्फोटांसारखा हादरवणारा विषय असूनही निघतांना आपण सहजपणे गुणगणतो, ‘ऐ दिल, है मुश्किल जीना यहाँ…!’

Ahmed Faraz - Image courtesy Internetआज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे – पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता. २००४ मधे त्यांना त्यांच्या साहित्यासाठी पाकिस्तानात हिलाल-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळाला होता, तो २००६ ला परत करतांना ते म्हणाले होते (विकीपिडीया च्या माहितीवरुन साभार) -

“My conscious will not forgive me if I remained a silent spectator of the sad happenings around us. The least I can do is to let the dictatorship know where it stands in the eyes of the concerned citizens whose fundamental rights have been usurped. I am doing this by returning the Hilal-e-Imtiaz (civil) forthwith and refuse to associate myself in any way with the regime…”

एका पतिभावान कवी शिवाय ते एक अतिशय सुसंस्कृत, विद्वान व्यक्तिमत्व होते. मला अर्वाचीन शायरांमधे त्यांची रोमँटीक शायरी अतिशय आवडते. रोमँटीक शायरीतही त्यांच्या कल्पनांचे नावीन्य, हळूवारपणा, हळवेपणा हा खूप भावतो. जसे -

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

त्यांच्या कित्येक गज़ला ह्या मेहदी हसन, गुलाम अली आणि जगजीत सिंग ह्यांनी गायल्या आहेत. त्यातली मेहदी हसनने गायलेली `रंजीश ही सही…’ ही अतिशय गाजलेली गज़ल. त्याशिवाय ‘अब के हम बिछडे’, ‘दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला’, ‘कठीन है राहगुजर’, ‘करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे, गज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊँ उसे’, ‘जो भी दुख याद न था याद आया’, ‘ज़िन्दगी से यही ग़िला है मुझे’, ‘फिर उसी राहगुजर पर…शायद’, ‘शोला था जल-बुझा हूँ’, ‘ये आलम शौक का देखा न जायें’ (त्यातील खास करुन कडवे – “फराज़ अपने सिवा है कौन तेरा, तुझे तुझसे जुदा देखा न जायें|” फारच सुरेख!), ‘ख्वाब मरते नहीं’ अशा कित्येक एकापेक्षा एक सरस गजला/नज्म आठवतात…गज़ल गाणारे गायक खूप प्रसिद्धी मिळवतात, पण त्यामानाने हे सुंदर शब्द लिहिणारे, त्या हळूवार भावना लिहिणारे कवी कित्येकदा अपरिचितच राहतात, त्याबद्द्ल खंत वाटते. ‘रंजीश हि सही ‘ माहित नसलेला गज़ल प्रेमी विरळाच, पण त्याचे शायर ‘अहमद फराज़’ होते हे कितीजणांना माहित असेल? असो!

हीच ती गाजलेली रंजीश हि सही -

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिए आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफ़ा है तो जमाने के लिए आ
कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-खुश-फ़हम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिए आ

-अहमद फ़राज
(मरासिम = नाती, relations; पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान, depth/pride of love; लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, taste of tears/sorrow; महरूम=वंचित, devoid of)

रंजीश हि सही इथे ऐकता आणि बघता येईल -

आणि ही माझी स्वतःची आतिशय आवडती अब के हम बिछडे…

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

ढुंड उजडे हुए लोगों मे वफा के मोती,
ये खजाने तुझे मुमकीन है खराबों मे मिले।

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनो इन्साँ है तो क्यों इतने हिजाबों मे मिले।

गमे-दुनियाँ भी गमे-यार मे शामिल कर लो,
नशा बढता है शराबें जो शराबों मे मिले।

अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’,
जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।

- अहमद फराज़

(खराब=खंडहर, हिजाब=गोशा, veil, सराब= भास, illusion )

अब के हम बिछडे इथे ऐकता आणि बघता येईल -

माझी ह्या जेष्ठ कवीला माझी छोटीशी श्रद्धांजली. त्यांची लेखणी आता ‘ख्वाब कभी मरते नहीं…’ अशा आदर्शवादी, आशावादी किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले, जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।’ अशा हळुवार रचना लिहिणार नाही…


अवांतर – मेहदी हसन कित्येक वेळा ‘रंजीश ही सही’ गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर ’तालिब बाग़पती’ ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ ‘रंजिश ही सही’ ह्या गज़ल मधे ते नाहित.

ते अशआर असे -

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ|

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|

काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून ‘रंजिश ही सही’ ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही — आणि अर्थातच शायरही तो नाही.

Older Posts »